Wednesday, November 29, 2017

Samas Navava Purusha Prakruti समास नववा पुरुषप्रकृती


Dashak Dahava Samas Navava Purusha Prakruti 
Samas Navava Purusha Prakruti, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Purusha and Prakruti in this Samas. Their relation with MoolMaya and much more is described in here.
समास नववा पुरुषप्रकृती 
श्रीराम ॥
आकाशीं वायो जाला निर्माण । तैसी ब्रह्मीं मूळमाया जाण ।
त्या वायोमधें त्रिगुण । आणी पंचभूतें ॥ १ ॥
१) आकाशामधें जसा वायु निर्माण होतो, तशी परब्रह्मामधें मूळमाया झाली. त्या वायुमधें तीन गुण व पांच भूतें असतात. 
वटबीजी असे वाड । फोडून पाहातां न दिसे झाड ।
नाना वृक्षांचे जुंबाड । बीजापासून होती ॥ २ ॥
२) वडाचे बी लहान असतें. पण त्यांत वडाचा मोठा वृक्ष असतो. तें बीज फोडून पाहिलें तर त्यांत तो वृक्ष दिसत नाहीं. अनेक वृक्षांचे समूह त्या बीजापासून होतात. 
तैसी बीजरुप मूळमाया । विस्तार जाला तेथुनियां ।
तिचें स्वरुप शोधुनियां । बरें पाहावें ॥ ३ ॥
३) मूळमाया त्या बीजासारखींच आहे. तिच्यामध्यें या विश्र्वरुप प्रचंड वृक्षाचा विस्तार होतो. त्या मूळमायेचे स्वरुप कसें आहें तें खोल सूक्ष्म विचारानें शोधून पहावें.  
तेथें दोनी भेद दिसती । विवेकें पाहावी प्रचिती ।
निश्र्चळीं जे चंचळ स्थिती । तोचि वायो ॥ ४ ॥
४) मूळमायेचा शोध घेतांना दोन तत्वें आढळतात. सूक्ष्म विचारानें त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. निश्चळ स्वरुपामध्यें जी हालचाल होतें तोच वायु होय. 
तयामधें जाणीवकळा । जगज्जोतीचा जिव्हाळा ।
वायो जाणीव मिळोन मेळा । मूळमाया बोलिजे ॥ ५ ॥
५) त्या वायुमध्यें शुद्ध जाणीव वास करते. ती जाणीव म्हणजेच जगत् ज्योतीचा मूळ झरा आहे. म्हणून वायु आणी त्यामधील शुद्ध जाणीव दोन्ही मिळून मूळमाया असते.  
सरिता म्हणतां बायको भासे । तेथें पाहातां पाणीच असे ।
विवेकी हो समजा तैसें । मूळमायेसी ॥ ६ ॥
६) सरिता म्हणजे नदी, पण तो शब्द उच्चारताच बाईची कल्पना मनांत येते. पण ते प्रत्यक्ष पाणीच असते. तसेंच मूळमायेच्या बाबतींत होते. परंतु तें तसें नाहीं हें ध्यानांत ठेवून मूळमायेचा शोध घ्यावा. 
वायो जाणीव जगज्जोती । तयास मूळमाया म्हणती ।
पुरुष आणी प्रकृती । याचेंच नांव ॥ ७ ॥
७) वायु, जाणीव आणि जगत्ज्योती यांच्या मेळ्याला मूळमाया म्हणतात. पुरुष व प्रकृति हें मूळमायेचेंच नांव आहे. 
वायोस म्हणती प्रकृती । आणि पुरुष म्हणती जगज्जोती ।
पुरुषप्रकृती शिवशक्ती । याचेंच नांव ॥ ८ ॥
८) वायुला म्हणतात प्रकृति व जगत्ज्योतीला म्हणतात पुरुष. पुरुषप्रकृति यांनाच शिवशक्ति हें दुसरें नांव आहे. 
वायोमधें जाणीव विशेष । तोचि प्रकृतीमधें पुरुष ।
ये गोष्टीचा विश्र्वास । धरिला पाहिजे ॥ ९ ॥
९) वायुमधें जी विशेष जाणीव आढळते तोच प्रकृतिमधील पुरुष होय. या गोष्टीचा विश्र्वास धरणें जरुर आहे. 
वायो शक्ति जाणावी ईश्र्वर । अर्धनारी नटेश्र्वर ।
लोक म्हणती निरंतर । येणें प्रकारें ॥ १० ॥
१०) वायु, शक्ति आणि जाणीव ईश्र्वर होय. अशा रीतीनें लोक अर्धनारी नटेश्र्वर असा नेहमीं उल्लेख करतात. 
वायोमध्यें जाणीव गुण । तेंचि ईश्र्वराचें लक्षण ।
तयापासून त्रिगुण । पुढें जाले ॥ ११ ॥
११) वायूमधें जाणीवेचा जो गुण आहे तें ईश्र्वराचें लक्षण समजावें. त्याच्यापासून नंतर सत्व, रज व तम हें तीन गुण निर्माण होतात. 
तया गुणांमधें सत्वगुण । निखळ जाणीवलक्षण ।    
त्याचा देहधारी आपण । विष्णु जाला ॥ १२ ॥
१२) त्यापैंकीं सत्वगुण शुद्ध जाणीव आहे. त्या गुणाचा देह धारण केला तो विष्णू होय. 
त्याच्या अंशें जग चाले । ऐसें भगवद्गीता बोले ।
गुंतले तेचि उगवले । विचार पाहातां ॥ १३ ॥
१३) त्याच्या अंशानें जग चालते असें भगवत्गीता म्हणते. दृश्यामधें गुंतल्यानें शुद्ध जाणीवेचा हा अंश लोपून जातो. जे सूक्ष्म विचार करुन पाहातात त्यांना तो प्रचितीला येतो.  
येक जाणीव वांटली । प्राणीमात्रास विभागली ।  
जाणजाणों वांचविली । सर्वत्र काया ॥ १४ ॥
१४) ज्या जाणीवेचा विष्णु झाला ती जाणीव सर्व प्राण्यामध्यें विभागली गेली. तिच्या प्रेरणेनें प्रत्येक प्राणी समजून आपल्या देहाचे रक्षण करतो.  
तयेचे नांव जगज्जोती । प्राणीमात्र तिचेन जिती ।
याची रोकडी प्रचिती । प्रत्यक्ष पाहावी ॥ १५ ॥ 
१५) तिला जगत्ज्योति म्हणतात. प्रत्येक प्राणी तिच्यामुळें जिवंत राहतो. हा अगदी रोकडा प्रत्यक्ष अनुभव आहे. 
पक्षी श्र्वापद किडा मुंगी । कोणीयेक प्राणी जगीं ।
जाणीव खेळे त्याचा आंगीं । निरंतर ॥ १६ ॥
१६) पक्षी, जनावरें, किडे, मुंग्या वगैरे जे प्राणी जगांत आढळतात, त्यांच्या अंगांत जाणीव निरंतर खेळत असते.  
जाणोनि काया पळविती । तेणें गुणें वांचती ।
दडती आणि लपती । जाणजाणों ॥ १७ ॥
१७) एखादा कठिण प्रसंग आला कीं, प्राणी तो जाणीवेनेंच ओळखतात व ते तेथून पळून जातात व आपला जीव वाचवतात. या जाणिवेमुळेंच तें कधीं दडून किंवा लपून बसतात. 
आवघ्या जगास वांचविती । म्हणोनि नामें जगज्ज्योती ।
ते गेलियां प्राणी मरती । जेथील तेथें ॥ १८ ॥
१८) अशा रीतीनें ही जाणीव सर्व जगाला सांभाळते म्हणून तिला जगत्ज्योति म्हणतात. ती शरीरांतून बाहेर पडली कीं, माणूस जेथल्या तेथें मरुन पडतो. 
मुळींचे जाणीवेचा विकार । पुढें जाला विस्तार । 
जैसे उदकाचे तुषार । अनंत रेणु ॥ १९ ॥
१९) मूळ मायेमध्यें असणारी जाणीव अनंत व अपार असते. तिच्यामध्यें बदल झाला व पुढें हा सगळा पसारा झाला. पाणी मूळ एकच असते परंतु त्यामधून अनंत तुषार बाहेर पडतात. तें अत्यंत सूक्ष्म व लहान असतात. त्याच प्रमाणें मूळमायेमधील एकाच विशाल जाणीवेंतून अनंत छोटे अंश निर्माण झाले. तेच जगांत प्राण्यांच्या रुपानें पसरले.   
तैसे देव देवता देवतें  भूतें । मिथ्या म्हणों नये त्यांतें ।
आपलल्या सामर्थ्ये ते । सृष्टीमधें फिरती ॥ २० ॥
२०) म्हणून देव, देवता, दैवतें आणि भूतें यांना खोटें मानूं नये. ते जाणिवेचे भिन्न प्रकार आहेत. ज्याला ज्या प्रमाणांत जाणीव त्या प्रमाणांत त्याला सामर्थ्य असते. म्हणून या योनी विश्वामधें आपापल्या सामर्थ्याप्रमाणें वावरतात.   
सदा विचरती वायोस्वरुपें । स्वइच्छा पालटिती रुपें ।
अज्ञान प्राणी भ्रमें संकल्पें । त्यास बाधिती ॥ २१ ॥
२१) ते सदैव वायुरुपानें संचार करतात. मनास येईल तसा देह धारण करतात. अज्ञानी माणसांना त्यांच्या भ्रमामुळें किंवा संकल्पामुळें बाधा करतात. 
ज्ञात्यास संकल्पचि असेना । म्हणोन त्यांचेन बाधवेना ।
याकारणें आत्मज्ञाना । अभ्यासावें ॥ २२ ॥
२२) ज्ञानी माणसाला मुळीं संकल्पच नसतो. म्हणून त्यांना ही बाधा होऊ शकत नाहीं. या कारणासाठीं आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. 
अभ्यासिलीयां आत्मज्ञान । सर्व कर्मास होये खंडण ।
हे रोकडी प्रचित प्रमाण । संदेह नाहीं ॥ २३ ॥
२३) आत्मज्ञानाचा अभ्यास केला असतां सर्व कर्मांचा नाश होतो. माझा असा साक्षात अनुभव आहे. यामध्यें मुळींचसुद्धा संशय नाहीं.    
ज्ञानेविण कर्म विघडे । हें तों कदापि न घडे ।
सद्गुरुवीण ज्ञान जोडे । हेंहि अघटीत ॥ २४ ॥
२४) ज्ञानावाचून कर्माचें बंधन नाहींसें होते असें कधीही घडत नाहीं. त्याचप्रमाणें सद्गुरुवाचून ज्ञान झाले असें देखील कधीं घडलें नाही.
म्हणोन सद्गुरु करावा । सत्संग शोधून धरावा ।
तत्वविचार विवरावा । अंतर्यामीं ॥ २५ ॥
२५) म्हणून ज्याला आत्मज्ञान हवे असेल त्यानें सद्गुरु करावा. नीट चौकशी करुन संतसंगत करावी. आणि आपल्या अंतरंगांतच तत्वांचा विचार करावा.   
तत्वें तत्व निरसोन जातां । आपला आपणचि तत्वता ।
अनन्यभावें सार्थकता । सहजचि जाली ॥ २६ ॥
२६) तत्त्वांचा सूक्ष्म विचार करतां करतां एकानें दुसर्‍या तत्वाचा, दुसर्‍यानें तिसर्‍या तत्वाचा असा तत्वांचा निरास होतो. तत्त्वांचे निरसन झालें म्हणजे जें शिल्लक उरतें तें आपलें खरें शुद्ध स्वरुप होय. त्या शुद्ध स्वरुपाशीं आपण तदाकार झालो कीं आत्मसाक्षात्कार होतो. त्यामुळें आपोआप सार्थकता होते.   
विचार न करितां जें जें केलें । तें तें वाउगें वेर्थ गेलें ।
म्हणोनि विचारीं प्रवर्तलें । पाहिजे आधीं ॥ २७ ॥
२७) नीट विचार न करितां केलेल साधन वायां जातें म्हणून साधकानें प्रथम नीट विचार करायला सुरवात करावी.
विचार पाहेल तो पुरुष । विचार न पाहे तो पशु ।
ऐसी वचनें सर्वेशु । ठाईं ठाईं बोलिला ॥ २८ ॥
२८) जो नीट विचार करेल तोच खरा मनुष्य आहे. जो विचार करीत नाहीं तो पशु समजावा. अशा अर्थांची वचनें भगवंत ठिकठिकाणी बोलला आहे. 
सिद्धांत साधायाकारणें । पूर्वपक्ष लागे उडवणें ।
परंतु साधकां निरुपणें । साक्षात्कार ॥ २९ ॥
२९) सिद्धान्त काय आहे हें लक्षांत येण्यास प्रथम पूर्वपक्षाचे खंडण करावें लागतें. परंतु साधकाला या भनगडीची जरुर नसतें. त्याला नुसत्या स्वानुभवसंपन्न निरुपणानेच साक्षात्कार होतो.  
श्रवण मनन निजध्यास । प्रचितीनें बाणतां विश्र्वास ।
रोकडा साक्षात्कार सायास । करणेंचि नलगे ॥ ३० ॥
३०) प्रथम श्रवण करावें, त्याचें उत्तम मनन करावें, नंतर निदिध्यास लागावा. रात्रंदिवस मनांमध्यें तेंच घोळत राहातें. मग हळुहळु परमार्थमार्गांतील अनुभव येऊं लागतात. त्यानें साधकाची श्रद्धा अधिक दृढ बनत जाते. अखेर त्यास प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार होतो. त्यासाठीं काहीं निराळा प्रयत्न करावा लागत नाहीं.   
इति श्रीदासबोधें गुरुशिष्यसंवादे पुरुषप्रकृतीनाम समास नववा ॥
Samas Navava  Purusha Prakruti 
समास नववा पुरुषप्रकृती 


Custom Search

Monday, November 27, 2017

Samas Aathava Pracit Nirupan समास आठवा प्रचितनिरुपण


Dashak Dahava Samas Aathava Pracit Nirupan 
Samas Aathava Pracit Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Prachiti means Experience. Sadhak gets knowledge that whatever he sees is unreal that is Maya and whatever he doesn’t see that is Brahma is real. He now knows that even if he doesn’t see the Brahma it is real. Swami Samarth here says that this knowledge must be based on the experience.
समास आठवा प्रचितनिरुपण
श्रीराम ॥
ऐका प्रचितीचीं लक्षणें । प्रचित पाहेल तें शाहाणें ।
येर वेडे दैन्यवाणें । प्रचितीविण ॥ १ ॥
१) आतां प्रचितीची लक्षणें ऐकावी. जो प्रचीति पाहातो, जो स्वानुभव घेतो तो खरा शहाणा होय. प्रचीति न घेणारे बाकीचे सगळे लोक वेडे व खालच्या प्रतीचे समजावेत.  
नाना रत्नें नाना नाणीं । परीक्षून न घेतां हानी ।
प्रचित न येतां निरुपणीं । बैसोंच नये ॥ २ ॥
२) अनेक प्रकारची  नाणीं व रत्नें असतात. त्यांची पारख, परिक्षा न करतां ती घेतली तर नुकसान होतें. ज्या निरुपणामध्यें स्वानुभव नाहीं किंवा अनुभव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन नाहीं, तेथें बसूच नये.  
तुरंग शस्त्र दमून पाहिलें । बरें पाहातां प्रचितीस आले ।
तरी मग पाहिजे घेतलें । जाणते पुरुषीं ॥ ३ ॥
३) घोडा चालवून बघावा. शस्त्र वापरुन बघावें. असें केल्यावर तें उत्तम प्रतीचे ठरलें तरच तें जाणत्या पुरुषानें घ्यावें. 
बीज उगवेलसें पाहावें । तरी मग द्रव्य घालून घ्यावें ।
प्रचित आलियां ऐकावें । निरुपण ॥ ४ ॥
४)  बी चांगलें उगवते असें पाहावें. मग तसें असेल तर पैसें देऊन विकत घ्यावें. निरुपण करणारा जें सांगतो त्याची प्रचिती आली तरच त्याचे निरुपण ऐकावें.  
देहीं आरोग्यता जाली । ऐसी जना प्रचित आली ।
तरी मग आगत्य घेतली । पाहिजे मात्रा ॥ ५ ॥
५) देहाला झलेला विकार एखाद्या मात्रेनें बरा होतो असा इतर लोकांना अनुभव आला असेल तरच आपण ती मात्रा अगत्यानें घेतलीं पाहिजे.  
प्रचितीविण औषध घेणें । तरी मग धडचि विघडणे ।
अनुमानें जें कार्य करणें । तेंचि मूर्खपण ॥ ६ ॥
६) ज्या औषधाचा कोणीही अनुभव घेतलेला नसेल तर तें आपण घेतल्यास चांगली प्रकृति बिघडेल. उगीच अनुमानानें कार्य केलें तर मूर्खपणा होतो.  
प्रचितीस नाहीं आलें । आणी सुवर्ण करविलें । 
तरी मग जाणावें ठकिलें । देखतदेखतां ॥ ७ ॥
७) एखाद्यानें लोखंडाचे सोनें करुन देतो असें म्हटले व आपण त्याच्या विद्येचा अनुभव नसतां त्याला सोनें करुन देण्यास सांगितलें तर तो बघतां बघतां आपल्याला फसवितो. 
शोधून पाहिल्याविण । कांहींतरी येक कारण ।
होणार नाहीं निर्वाण । प्राणास घडे ॥ ८ ॥
८) सुरवातीस चांगली चौकशी न करतां एखदे काम अंगावर घेतलें तर तें काम तडीस जाणार नाहीं उलट आपल्या जीविताला धोका निर्माण होण्याचा संभव असतो.  
म्हणोनी अनुमानाचें कार्य । भल्यांनी कदापि करुं नये ।
उपाय पाहातां अपाये । नेमस्त घडे ॥ ९ ॥
९) म्हणून शहाण्या माणसानें कल्पना करुन अनुमानानें कोणतेंही कार्य करुं नये.  नपेक्षा उपायाऐवजी अपाय मात्र खात्रीनें घडतो. 
पाण्यांतील म्हैसीची साटी । करणें हें बुद्धिच खोटी । 
शोधिल्याविण हिंपुटी । होणें घडे ॥ १० ॥
१०) समजा एक म्हैस पाण्यांत बसली आहे. ती कशी आहे वगैरे न बघतांच तिची खरेदी करणें म्हणजे खोटीच बुद्धि होय. तिला नीट न पाहिल्यानें नंतर कष्टी व्हावें लागतें.
विश्र्वासें घर घेतलें । ऐसें किती नाहीं ऐकिलें ।
मैंदे मैदावें केलें । परी तें शोधिलें पाहिजे ॥ ११ ॥
११) स्वतः न पाहातां दुसर्‍याच्या भरवश्यावर घर घेतलें, असें कधी कोणी ऐकले आहें कां ? जगांत लबाड लोक फसवण्यचा प्रयत्न करणारच पण आपण नीट चौकशी करुन काम केलें पाहीजे.      
शोधल्याविण अन्नवस्त्र घेणें । तेणें प्राणास मुकणें ।
लटिक्याचा विक्ष्वास धरणें । हेंचि मूर्खपण ॥ १२ ॥
१२) नीट तपास केल्यावाचून अन्नवस्त्र घेणें म्हणजे जीव गमावण्याची पाळी आणणे. खोट्याचा विश्र्वास बाळगणें मूर्खपणाच होय.
संगती चोराची धरितां । घात होईल तत्वता ।
ठकु सिंतरु शोधितां । ठाईं पडे ॥ १३ ॥
१३) चोराची संगत धरली तर नक्कीच आपला घात होतो. नीट तपास केला तर चोर, ठक, लबाड लोक तिथल्या तिथे ओळखूं येतात. 
गैरसमज तामगिरी । कोणी नवी मुद्रा करी ।
नाना कपट परोपरीं । शोधून पाहावें ॥ १४ ॥
१४) खोटी नाणीं पाडणारें, तांब्याचें सोनें करतो म्हणणारे, चोरुन सरकारला न कळतां खरीं नाणीं करणारें, वगैरे नाना प्रकारच्या लबाड्या जगांत चालतात. आपण त्या समजून संभाळून असावें.    
दिवाळखोराचा मांड । पाहातां वैभव दिसे उदंड ।
परी तें अवघें थोतांड । भंड पुढें ॥ १५ ॥
१५) एखादा दिवाळखोर असा बडेजाव दाखवतो कीं त्याच्याजवळ पुष्कळ धन आहे असें वाटते. पण त्याचा तो बडेजाव म्हणजे थोतांड असतें. पुढें त्याची फजीति होते.   
तैसें प्रचितीवीण ज्ञान । तेथें नाहीं समाधान । 
करुन बहुतांचा अनुमान । अन्हीत जालें ॥ १६ ॥
१६) त्याचप्रमाणें ज्या पुरुषाला स्वानुभव नाहीं, त्याचें ज्ञान म्हणजें थोतांड होय. त्याच्यापाशीं खरें समाधान नसतें. आपल्या अनुभवरहित व अनुमानप्रधान ज्ञानानें तो अनेक लोकांना आपल्या नादीं लावतो. तसें करुन तो स्वतःचे व लोकांचे अनहीत करण्यास कारण होतो.   
मंत्र यंत्र उपदेसिले । नेणतें प्राणी तें गोविलें ।
जैसें झांकून मारिलें । दुखणाईत ॥ १७ ॥
१७) अनुभवविहीन लोक गुरुपणाचा आव आणून अडाणी लोकांना मंत्र यंत्र चा उपदेश करुन त्यांत त्यांना गुंतवतात. व त्यांचे नुकसान करतात. एखाद्या आजारी माणसाला झांकून ठेवावा व त्याला मारुन टाकावा तसा हा प्रकार होय.  
वैद्य पाहिला परी कच्चा ।  तरी प्राण गेला पोराचा ।
येथें उपाये दुसर्‍याचा । काये चाले ॥ १८ ॥
१८) समजा एखाद्याचा मुलगा फार आजारी आहे. त्याला औषध देण्यासाठीं अनुभव नसलेला व अपरिपक्व वैद्य आणला. त्यामुळें त्या मुलाचा मृत्यु ओढवला. अशावेळीं इतर माणसें कांहीं उपाय करुं शकत नाहींत.  
दुःखें अंतरीं झिजे । आणी वैद्य पुसतां लाजे ।
तरीच मग त्यासी साजे । आत्महत्यारेपण ॥ १९ ॥
१९) एक माणूस दुखण्यानें झिजत चालला आहे. पण वैद्यानें काय होतें म्हणून विचारलें तर मोकळेपणानें सांगण्यास त्याला लाज वाटते. असा माणूस स्वतःचा घात करुन घेतो असें म्हणणें बरोबर आहे.   
जाणत्यावरी गर्व केला । तरी नेणत्याकरितां बुडाला ।
येथें कोणाचा घात जाला । बरें पाहा ॥ २० ॥  
२०) जो जाणता आहे त्याला गर्वानें तुच्छ केलें तर नेणता माणूस आपल्या अज्ञानानें बुडतो, अशारीतीनें तो स्वतःच स्वतःचा घात करुन घेतो.         
पापाची खंडणी जाली । जन्मयातना चुकली ।
ऐसी स्वयें प्रचित आली । म्हणिजे बरें ॥ २१ ॥
२१) पाप संपूर्णपणें नाश पावलें. पुन्हा जन्मास येऊन यातना भोगणें थांबलें, असा प्रत्यक्ष अनुभव स्वतःला आला म्हणजे आत्मज्ञान झालें असें समजावें.  
परमेश्र्वरास वोळखिलें । आपण कोणसें कळलें ।
आत्मनिवेदन जालें । म्हणिजे बरें ॥ २२ ॥
२२) परमेश्र्वराची ओळखण झाली, मी खरा कोण हें कळलें, संपूर्ण शरणागति साधली म्हणजे आत्मज्ञान झालें असें समजावें. 
ब्रह्मांड कोणें केलें । कासयाचें उभारलें ।
मुख्य कर्त्यास वोळखिलें । म्हणिजे बरें ॥ २३ ॥
२३) हें विश्र्व कोणीं केलें हें समजलें, तें कशानें केलें हें कळलें, कर्ता खरा कोण हें ओळखलें म्हणजें आत्मज्ञान झालें असें समजावें.  
येथें अनुमान राहिला । तरी परमार्थ केला तो वायां गेला ।
प्राणी संशईं बुडाला । प्रचितीविण ॥ २४ ॥
२४) वर सांगितलेल्या गोष्टींसंबंधीं थोडा जरी संशय मनांत असेल तर तोपर्यंत केलेला परमार्थ वाया गेला असें समजावें. साक्षात् स्वरुपानुभव नसल्यानें  माणूस संशयानें घेरला जातो.  
हें पमार्थाचें वर्म । लटिकें बोले तो अधम ।
लटिकें मानी तो अधमोद्धम । येथार्थ जाणावा ॥ २५ ॥
२५) परमार्थाचें रहस्य हे आहे. हें खोटे आहे असें जो म्हणेल तो अधम समजावा. हें खोटें असेम जो मानील तो तर अधमाहून अधम निश्र्चितपणें मानावा.  
येथें बोलण्याची जाली सीमा । नेणतां न कळे परमात्मा ।
असत्य नाहीं सर्वोत्तमा । तूं जाणसी ॥ २६ ॥
२६) यापुढें सांगण्याची सोय उरली नाहीं. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत परमात्मस्वरुप कळणार नाहीं. ही गोष्ट खोटी नाहीं. सर्वोत्तम रामराया, माझ्या म्हणण्याचा भावार्थ तूं बरोबर जाणतोस.   
माझे उपासनेचा बडिवार । ज्ञान सांगावें साचार ।
मिथ्या बोलला उत्तर । प्रभूस लागे ॥ २७ ॥
२७) माझ्या उपासनेचें थोर वैशिष्ट्य असें आहें कीं, अगदी खरें आत्मज्ञान सांगावें. मी जर खोटे व वावगे बोलेन तर त्याचा दोष रामरायास लागेल.  
म्हणोनि सत्यचि बोलिलें । कर्त्यास पाहिजे वोळखिलें ।
मायोद्भवाचें शोधिलें । पाहिजे मूळ ॥ २८ ॥
२८) म्हणून जें सांगतों तें संपूर्ण सत्य आहे. खरा कर्ता कोण हें साधकानें ओळखलें पाहिजे. माया कोठे व कशी उत्पन्न झाली याचें मूळ शोधून काढलें पाहिजे.  
तेंचि पुढें निरुपण । बोलिलेंचि बोलिलें प्रमाण ।
श्रोतीं सावध अंतःकर्ण । घातलेंचि घालावें ॥ २९ ॥
२९) या विषयाचेच विवेचन पुढें केलेलें आहे. मागें जे सांगितलें तेंच पुन्हा वर्णन केलेले आढळेल. श्रोत्यामनी तें एकदा ऐकलेले आहे पण परत त्यांनीं सावधवरुत्तीनें ऐकावें. 
सूक्ष्म निरुपण लागलें । तेथें बोलिलेंचि मागुतें बोलिलें ।
श्रोत्यांस पाहिजे उमजलें । म्हणौनियां ॥ ३० ॥
३०) हा विषय सूक्ष्म आहे. त्याचें विवेचन चटकन ध्यानांत येत नाहीं. श्रोत्यांना तो नीट समजावा म्हणून तें परत सांगावें लागतें.   
प्रचित पाहातां निकट । उडोन जाती परिपाठ ।
म्हणोनि हे खटपट । करणें लागे ॥ ३१ ॥
३१) सूक्ष्म अनुभव घेऊन बघितलें तर परंपरेनें चालत आलेल्या लोकांच्या कल्पना खोट्या ठरतात. म्हणून परमार्थ पुनः पुनः सांगणें जरुर पडतें.
परिपाठेंचि जरी बोलिलें । तरी प्रचित समाधान बुडालें ।
प्रचितसमाधान राखिलें । तरी परिपाठ उडे ॥ ३२ ॥
३२) येथें पेच असा येतो कीं, परंपरागत जनसमजुतीप्रमाणें सांगायचे म्हटलें तर स्वानुभवाचें समाधान राहात नाहीं. आणि स्वानुभवाप्रमाणें बोलायचे म्हटलें तर परंपरागत लोककल्पना उडवल्यावाचून चालत नाहीं.  
ऐसी सांकडी दोहींकडे । म्हणौन बोलिलेंचि बोलणें घडे ।
दोनी राखोनियां कोडें । उकलून दाऊं ॥ ३३ ॥
३३) अशी दोन्हीकडून अडचण येते. म्हणून पूर्वीं जें सांगितलें तें पुनः पुनः सांगावें लागतें. आतां पूर्वपरंपरागत लोकसमजुती आणि स्वानुभव या दोन्हींचा समन्वय साधून हें कोडें उलगडून दाखवूं.    
परिपाठ आणी प्रचित प्रमाण । दोनी राखोन निरुपण । 
श्रोते परम विचक्षण । विवरोत पुढें ॥ ३४ ॥
३४) पूर्वपरंपरा व आत्मप्रचिती या दोन्हींचे प्रामाण्य भंग होणार नाहीं असें विवेचन करुं. बुद्धिमान श्रोत्यांनी त्या विवेचनाचें खोलवर मनन करावें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रचितनिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava  Pracit  Nirupan
समास आठवा प्रचितनिरुपण


Custom Search

Sunday, November 26, 2017

Samas Satava SagunaBhajan Nirupan समास सातवा सगुणभजन


Dashak Dahava Samas Satava SagunaBhajan Nirupan 
Samas Satava SagunaBhajan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Sagun Bhajan. Here in this Samas why Sagun Bhajan is to be done by Sadhak is described.
समास सातवा सगुणभजन
श्रीराम ॥
अवतारदिक ज्ञानी संत । सारासारविचारें मुक्त ।
त्यांचें सामर्थ्य चालत । कोण्या प्रकारें ॥ १ ॥ 
१) रामकृष्णादि अवतार, मोठे ज्ञानी पुरुष आणी संत सारासारविचारानें मुक्त झालेले असतात. त्यांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांचें सामर्थ्य येथें चालतें. तें कसें चालतें ?   
हे श्रोतयांची आशंका । पाहातां प्रश्र्ण केला निका ।
सावध होऊन ऐका । म्हणे वक्ता ॥ २ ॥
२) ही श्रोत्यांची शंका आहे. हा प्रश्र्ण खरोखर चांगला आहे. वक्ता म्हणतों कीं, याचे उत्तर लक्ष देऊन ऐकावें.  
ज्ञानी मुक्त होऊन गेले । मागें त्यांचें सामर्थ्य चाले ।
परंतु ते नाहीं आले । वासना धरुनी ॥ ३ ॥
३) आत्मज्ञानी पुरुष मुक्त होतात. नंतर प्रारब्ध संपलें कीं देह ठेवतात. देह थेवल्यानंतरही त्यांची सत्ता चालते, कार्य करते.  पण वासना धरुन ते परत येतात असें नाहीं.  
लोकांस होतो चमत्कार । लोक मानिती साचार ।
परंतु याचा विचार । पाहिला पाहिजे ॥ ४ ॥
४) लोकांना त्यांच्या अस्तित्वाचे चमत्कार अनुभवास येतात. लोक त्यांना सत्य मानतात. पण याचा खरा अर्थ काय याचा विचार केला पाहिजे. 
जीत आस्तां नेणों किती । जनामध्यें चमत्कार होती ।
ऐसियाची सद्यप्रचिती । रोकडी पाहावी ॥ ५ ॥
५) एखादा सत्पुरुष जिवंत असतां त्याच्याकडून लोकांसाठीं पुष्कळ चमत्कार झाले असतील. हें शक्य आहे. पण त्यानें देह ठेवल्यावर जे चमत्कार घडतात त्याची मात्र खरी प्रचिती तत्काळ बघितली पाहिजे.   
तो तरी आपण नाहीं गेला । लोकीं प्रत्यक्ष देखिला ।
ऐसा हा चमत्कार जाला । यास काये म्हणावें ॥ ६ ॥
६) समजा तो सत्पुरुष जिवंत असतांना त्याच्याच घरीं आहे. तेथून तो बाहेर गेलेला नाहीं असें असतांनाा एकाच दिवशीं, एकाच वेळीं तो दोन किंवा अधिक स्थानीं लोकंना प्रत्यक्ष दिसतो. या चमत्काराचे कारण काय असावें ?
तरी हा लोकांचा भावार्थ । भाविकां देव येथार्थ । 
अनेत्र कल्पना वेर्थ । कुतर्काची ॥ ७ ॥
७) याचें कारण असें कीं, लोकांच्या शुद्ध भावनेनें हें घडून येते. संत देवरुप  असतो. व जशी ज्याची भावना असतें तसा त्याला देव फळतो. चमत्काराचें हेंच एकमेव कारण आहे. इतर कल्पना करणें म्हणजे निष्कारण वेडेपणानें तर्क करणें होय.  
आवडे तें स्वप्नीं देखिलें । तरी काय तेथून आलें ।
म्हणाल तेणें आठविलें । तरी द्रव्य कां दिसे ॥ ८ ॥
८) मनापासून आपल्याला जें आवडतें तें स्वप्नांत दिसतें. पण जें दिसतें तें बाहेरुन कोठून आलेले नसते. यावर आक्षेप असा कीं, त्या वस्तुचें आपल्याला स्मरण होतें म्हणून ती दिसतें हें खरें नाहीं. कारण वस्तूचें स्मरण झालें तर ती प्रत्यक्ष दिसतें असें नाहीं. परंतु स्वप्नामध्यें ती प्रत्यक्ष दिसतें, याचें कारण काय ? 
एवं आपली कल्पना । स्वप्नीं येती पदार्थ नाना ।
परी ते पदार्थ चालतीना । अथवा आठऊ नाहीं ॥ ९ ॥
९) थोडक्यांत आपण कल्पना केली त्यामुळें अनेक वस्तु स्वप्नामध्यें दिसतात. त्या वस्तुंचें स्मरण होतें म्हणून त्या दिसतात हें खरें नाहीं. तसेंच त्यांचा व्यवहारांत कांहीं उपयोग नाहीं. हेही खरें आहे. 
येथें तुटली आशंका । ज्ञात्यास जन्म कल्पूं नका ।
उमजेना तरी विवेका । बरें पाहा ॥ १० ॥
१०) येथें श्रोत्यांच्या शंकेचें निरसन झालें. ज्ञानी पुरुषाला जन्म येतो ही कल्पना करुं नये. माझें सांगणें ाकलन होत नसेल तर सूक्ष्म विचार करुन बघा म्हणजे कळेल. 
ज्ञानी मुक्त होऊन गेले । त्यांचें सामर्थ्य उगेंचि चाले ।
कां जे पुण्यमार्गें चालिलें । म्हणोनियां ॥ ११ ॥
११) जे ज्ञानी पुरुष मुक्त होतात त्यांची सत्ता विनासायास व आपोआप चालते.  खर्‍या पुण्यमार्गानें तें गेलेले असतात. भगवंताच्या दर्शनाचा मार्ग तेवढा एकच खरा पुण्यमार्ग होय.   
याकारणें पुण्यामार्गें चालावें । भजन देवाचें वाढवावें ।
न्याये सांडून न जावें । अन्यायमार्गें ॥ १२ ॥
१२) यासाठीं माणसानें पुण्यमार्गानें चालावें. जगामध्यें भगवंताची भक्ति वाढवावी. न्यायाचा पक्ष सोडून अन्यायाच्या मार्गानें जाऊं नये. 
नाना पुरश्र्चरणें करावीं । नाना तीर्थाटणें फिरावीं ।
नाना सामर्थें वाढवावी । वैराग्यबळें ॥ १३ ॥
१३) अनेक प्रकारची पुरश्र्चरणें करावीत. अनेक तीर्थें करावीत. आणि प्रबळ वैराग्य धारण करुन अनेक प्रकारच्या शक्ति अंगीं वाढवाव्यात.  
निश्र्चये बैसे वस्तूकडे । तरी ज्ञानमार्गेहि सामर्थ्य चढे ।
कोणीयेक येकांत मोडे । ऐसें न करावें ॥ १४ ॥
१४) '" मी आत्मस्वरुप आहे " असा मनाचा निश्र्चय झाला तर ज्ञानमार्ग साधतो. व त्यानें अंगी मोठे सामर्थ्य येते. जेथें आपली निष्ठा असेल त्याला धक्का लागेल असें कांहीं करु नये.  
येक गुरु येक देव । कोठें तरी असावा भाव ।
भावार्थ नस्तां वाव । सर्व कांहीं ॥ १५ ॥
१५) एक सद्गुरु किंवा एक देव यापैकीं कोणावर तरी संपूर्ण निष्ठा ठेवावी. तसें नसेंल तर बाकीं सारें वाया जातें.  
निर्गुणी ज्ञान जालें । म्हणोन सगुण अलक्ष केलें ।
तरी तें ज्ञातें नागवलें । दोहिंकडे ॥ १६ ॥
१६) समजा एखाद्याला निर्गुणाचा अनुभव आला. निर्गुणाचे ज्ञान झालें म्हणून त्यानें सगुणाकाडे दुर्लक्ष केलें. सद्गुरु किंवा देवाची उपासना त्यानें सोडून दिली. असा ज्ञानी पुरुष दोन्हीकडून नागावला जातो. त्याला धड निर्गुण स्वाधीन होत नाही. तसेंच धड ना सगुण हाताशीं लागत नाहीं. 
नाहीं भक्ती नाहीं ज्ञान । मधेंच पैसावला अभिमान ।
म्हणौनियां जपध्यान । सांडूंच नये ॥ १७ ॥
१७) त्याच्यापाशीं ज्ञान म्हणावें तर तें नसते. व भक्ति म्हणावी तर ती पण नसते. म्हणून जप व ध्यान कांहीं केल्या सोडूं नये. 
सांडील सगुणभजनासी । तरी तो ज्ञाता परी अपेसी ।
म्हणौनियां सगुणभजनासी । सांडूंच नये ॥ १८ ॥  
१८) जो आत्मज्ञानी सगुणाची उपासना सोडून देतो तो ज्ञानी खरा पण अपयशी असतो. म्हणून सगुणाची उपासना कधीं सोडू नये.             
निःकाम बुद्धीचिया भजना । त्रैलोकीं नाहीं तुळणा ।
समर्थेविण घडेना । निःकाम भजन ॥ १९ ॥
१९) अत्यंत निष्कामबुद्धीनें केलेली म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवतां केलेली भगवंताची उपसना अनमोल आहे. या त्रैलोक्यांत तिची बरोबरी करणारी दुसरी वस्तु नाहीं. मोठें आत्मबल असल्याशिवाय कोणीही माणूस अशी उपासना करुं शकणार नाहीं.   
कामनेनें फळ घडे । निःकाम भजनें भगवंत जोडे । 
फळभगवंत कोणीकडे । महदांतर ॥ २० ॥
२०) कांहीं अपेक्षा ठेवून उपासना केली तर ती अपेक्षा पूर्ण होते. कांहींही अपेक्षा न ठेवतां उपासना केली तर प्रत्यक्ष भगवंत भेटतो. एखादी अपेक्षा पूर्ण होणें व प्रत्यक्ष भगवंत भेटणें यांत फार मोठे अंतर आहे, फरक आहे.  
नाना फळें देवापासी । आणी फळ अंतरीं भगवंतासी ।
याकारणें परमेश्र्वरासी । निःकाम भजावें ॥ २१ ॥
२१) भगवंताजवळ आपल्या सर्व अपेक्षा, वासना, मागण्या, इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य असते. पण आपण आपल्या इच्छाच पूर्ण करण्यामागें लागलों तर आपण भगवंताला अंतरतो. म्हणून अत्यंत निष्काम बुद्धीनें भगवंताची उपासना करावी.  
निःकामभजनाचें फळ आगळें । सामर्थ्य चढे मर्यादेवेगळें ।
तेथें बापुडीं फळें । कोणीकडे ॥ २२ ॥
२२) निष्काम बुद्धीनें केलेल्या उपासनेचे फळ कांहीं आगळेंच असतें. अशा उपासकाच्या अंगीं मोठे सामर्थ्य येते. तेथें कामनापूर्ती मुळींच किंमत राहत नाही. 
भक्तें जें मनीं धरावें । तें देवें आपणचि करावें ।
तेथें वेगळें भावावें । नलगे कदा ॥ २३ ॥
२३) कांहीं व्हावें असा संकल्प भक्ताच्या मनीं आला कीं, भगवंत तो आपणहून सिद्धीस नेतो. त्यासाठीं भक्ताला वेगळी प्रार्थना करावी लागत नाहीं. 
दोनी सामर्थें येक होतां । काळास नाटोपे सर्वथा ।
तेथें इतरांची कोण कथा । कीटकन्यायें ॥ २४ ॥
२४) आत्मज्ञान व भगवंताची भक्ती अशी दोन्ही सामर्थ्ये एकत्र आल्यावर तो ज्ञानी भक्त काळाला देखिल अनावर होतो. मग इतरांना तो भारी होतो यांत नवल काय ? इतर सारे त्याच्यापुढें क्षुद्र किड्यासारखें होतात.    
म्हणोन निःकाम भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान ।
तयास तुळितां त्रिभुवन । उणें वाते ॥ २५ ॥
२५) म्हणून अत्यंत निष्काम उपासना आणि ब्रह्मज्ञान असा योग आल्यावर त्याच्यापुढें त्रिभुवनसुद्धां उणे पडते.  
येथें बुद्धीचा प्रकाश । आणीक न चढे विशेष ।
प्रताप कीर्ती आणी येश । निरंतर ॥ २६ ॥
२६) ज्ञानी भक्ताचा महिमा यापेक्षां अधिक आकलन होणें बुद्धीला शक्य नसतें.  त्याचा प्रताप, कीर्ति, व यश निरंतर वर्धमान होत राहतात. 
निरुपणाचा विचार । आणी हरिकथेचा गजर ।
तेथें होती तत्पर । प्राणीमात्र ॥ २७ ॥
२७) ज्या ज्ञानी भक्तापाशीं अत्मज्ञानाचें विवेचन असतें आणि भगवंताच्या उपासनेचे बळ असतें तेथें पुष्कळ लोक आकर्षित होतात व त्या सत्पुरुषाशीं लिन होतात.  
जेथें भ्रष्टाकार घडेना । तो परमार्थहि दडेना ।
समाधान विघडेना । निश्र्चयाचें ॥ २८ ॥
२८) ज्या सत्पुरुषापाशीं भ्रष्टाचाराला स्थान नाहीं, जो नीतिधर्माला धरुन असतो, त्याचा परमार्थ लपून राहात नाहीं. आणि लोक जरी भोवती गोळा झाले तरी निश्र्चयाच्या आत्मज्ञानामुळें लाभलेलें समाधान भंगत नाहीं.  
सारासारविचार करणें । न्याये अन्याये अखंड पाहाणें ।
बुद्धि भगवंताचें देणें । पालतेना ॥ २९ ॥
२९) याकारणासाठीं साधकानें नेहमीं सारासार विचार करावा. न्याय कोणता, अन्याय कोणता, हें अखंड शोधावें. तरच आत्मज्ञानाकडे बुद्धी वळते. पण ही भगवंताची देणगी आहे. ती एकदां प्राप्त झालीं कीं, मग तिच्यांत बदल घडत नाहीं.   
भक्त भगवंती अनन्य । त्यासी बुद्धि देतो आपण ।
येदर्थीं भगवद्वचन । सावध ऐका ॥ ३० ॥
३०) जो भक्त भगवंतापाशीं अनन्य होतो, त्याला भगवंताचें मार्गदर्शन लाभते. त्याला योग्य बुद्धी व विचार करण्याची दिशा दाखवितो. याबद्दल भगवंताचे एक वचन आहे. तें ऐका.  
श्र्लोकार्ध
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते ॥
अर्थः
मी त्यांना बुद्धी देतो. त्यायोगें तें मला येऊन मिळतात. 
म्हणौन सगुण भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान ।
प्रयत्नांचें समाधान । दुर्ल्लभ जगीं ॥ ३१ ॥
३१) म्हणून भगवंताची सगुण उपासना आणि विशेष म्हणजे ब्रह्मज्ञान आणि त्यामुळें स्वनुभवाचें खरें समाधान या गोष्टीं जगांत फारच दुर्लभ आहेत. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सगुणभजननिरुपणनाम समास सातवा ॥
Samas Satava  SagunaBhajan  Nirupan
समास सातवा सगुणभजन



Custom Search

Friday, November 24, 2017

Samas Sahava Bhrama Nirupan समास सहावा भ्रमनिरुपण


Dashak Dahava Samas Sahava Bhrama Nirupan 
Samas Sahava Bhrama Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Bhrama. Neniva means Brahma, Lack of knowledge. We think that what we see is real. It is due to lack of knowledge.
समास सहावा भ्रमनिरुपण
श्रीराम ॥
उत्पत्ती स्थिति संव्हार । याचा निरोपिला वेव्हार ।
परमात्मा निर्गुण निराकार । जैसा तैसा ॥ १ ॥
१) उत्पत्ती, स्थिति आणि संहार कसा यासंबंधीं आतांपर्यंत विवेचन केलें. विश्वांत हें सर्व घडत असतांना निर्गुण, निराकार परमात्मा जसाच्या तसाच राहतो. 
होतें वर्ततें आणी जातें । याचा समंध नाहीं तेथें ।
आद्य मद्य अवसान तें । संचलेंचि आहे ॥ २ ॥
२)  विश्व निर्माण होतें. बराच काळ तें टिकते. व कल्पान्ती नाहींसें होते. परंतु परब्रह्माचा याशी कांहींहीं संबंध नसतो. विश्वाच्या आधी, विश्व निर्माण झाल्यावर आणि विश्व नाहींसे झाल्यावर परब्रह्म अगदी जसेंच्या तसें सर्वत्र दाट भरुन असतें.   
परब्रह्म असतचि असे । मध्येंचि हा भ्रम भासे ।
भासे परंतु अवघा नासे । काळांतरीं ॥ ३ ॥
३) परब्रह्म नेहमीं असतेंच असते. मध्येंच हा विश्वाचा भ्रम निर्माण होतो. विश्व आहे असें भासते परंतु कालांतरांनें तें नाहीसें होते. नाश पावते.  
उत्पत्तीस्थितीसंव्हारत । मध्येंहि अखंड होत जात ।
पुढें सेवटीं कल्पांत । सकळांस आहे ॥ ४ ॥
४) उत्पत्ति, स्थिति आणि संहार परब्रह्मामध्यें सारखें घशलेलें दिसतात. परंतु सगळ्याला कल्प संपलें कीं नाश ठेवलेलाच आहे. 
यामधें ज्यास विवेक आहे । तो आधींच जाणताहे ।
सारासार विचारें पाहे । म्हणौनियां ॥ ५ ॥
५) हें सर्व चालूं असतां मात्र ज्याच्याकडे विवेक आहे, तो हे सर्व आधींच जाणतो. जगांतील सर्व गोष्टींकडे तो सारख्याच एक नजरेनें बघतो. म्हणून त्याला असें अगोदर ज्ञान होतें. 
बहुत भ्रमिष्ट मिळाले । त्यांत उमजल्याचें काय चाले ।
सृष्टीमधें उमजले । ऐसे थोडे ॥ ६ ॥
६) समजा भ्रम झालेल्या लोकांचा एक समुह आहे. त्यामध्यें ज्याला भ्रम नाहीं असा माणूस गेला. जें खरें आहे तें तो त्यांना सांगू लागला तर त्याचें म्हणणें कोणी ऐकत नाही. तशी जगांतील माणसांची अवस्था आहे. येथें भ्रम असलेले बरेच व विश्वाचे खरें स्वरुप ओळखणारे थोडेच दिसतात.    
त्या उमजल्यांचें लक्षण । कांहीं करुं निरुपण ।
भ्रमाहून विलक्षण । महापुरुष ॥ ७ ॥ 
७) विश्वाचें खरें स्वरुप जाणणारे जे ज्ञानी त्यांच्याबद्दल थोडें विवेचन करतो. जो भ्रमाहून निराळा असतो, दूर असतो तोच महापुरुष होय.  
भ्रम हा नसेल जयासी । मनीं वोळखावे तयासी ।
ऐक आतां भ्रमासी । निरोपिजेल ॥ ८ ॥
८) ज्या पुरुषाला कसलाही भ्रम नाहीं, अशाला मनांत ओळखून राहावें. तें ओळखतां यावें म्हणून निरनिराळ्या भ्रमांचे वर्णन आतां करतो. 
येक परब्रह्म संचलें । कदापी नाहीं विकारलें । 
त्यावेगळें भासलें । तें भ्रमरुप ॥ ९ ॥
९) परब्रह्मरुपी एकच एक सद्वस्तु सगळीकडे भरुन राहीली आहे. तिच्यामधें कधींही कोणताही विकार किंवा बदल होत नाहीं. ती तशी अनुभवास न येतां जें जें कांहीं अन्य अनुभवास येतें तें तें सारें भ्रमरुप होय.  जयासी बोलिला कल्पांत । त्रिगुण आणी पंचभूत ।
हें अवघेंचि समस्त । भ्रमरुप ॥ १० ॥
१०) ज्या ज्या गोष्टींना, वस्तूंना, अनुभवांना, कल्पनांना आज ना उद्या  प्रलयकालीं अंत आहे, त्या सगळ्या भ्रमांत मोडतात. पांच भूतें व त्रिगुण हें सर्व भ्रमरुप आहेत.     
मी तूं हा भ्रम । उपासनाहि भ्रम ।
ईश्र्वरभाव हाहि भ्रम । निश्र्चयेंसीं ॥ ११ ॥
११) त्याचप्रमाणें मी आणि तूं, देव आणि भक्त; उपासना व खुद्द ईश्र्वर देखील सर्व निश्र्चितपणें भ्रमरुपच आहेत.  
श्र्लोक 
भ्रमेणाहं भ्रमेण त्वं । भ्रमेणोपासका जनाः ।
भ्रमेणोश्वरभावत्वं । भ्रममूलमिदं जगत् ॥
श्र्लोकार्थ 
भ्रमानें  " मी " आहे असा भास होतो. भ्रमानें " तूं ' आहेस असें वाटतें ; '" भक्त व उपासक "  खरें वाटणें हा भ्रमाचाच परिणाम आहे. " ईश्र्वर आहे " असे वाटणें हा भ्रमच आहे. थोडक्यांत हें सारें विश्व भ्रमरुप आहे.  
याकारणें सृष्टि भासत । परंतु भ्रमचि हा समस्त ।
यामध्यें जे विचारवंत । तेचि धन्य ॥ १२ ॥
१२) या कारणानें हें एवढें विश्व प्रत्यक्ष आहे असें जरी वाटलें तरी तो सगळा भ्रमच आहे. म्हणून जगामध्यें जे खरोखर विवेकशील विचारवंत असतात ते धन्य समजावेत. 
आतां भ्रमाचा विचारु । आत्यंतचि प्रांजळ करुं ।
दृष्टांतद्वारें विवरुं । श्रोतयांसी ॥ १३ ॥
१३) भ्रमाचें स्वरुप अगदीं स्पष्ट होईल असें विवेचन आतां करतो. अनेक उदाहरणें देऊन भ्रमस्वरुप श्रोत्यांच्या नजरेस आणतो. 
भ्रमण करितां दूरी देसीं । दिशाभूलि आपणासी ।
कां वोळखी मोडे जीवलगांसी । या नां भ्रम ॥ १४ ॥
१४) आपल्या गांवापासून दूर असलेल्या अज्ञात भागामध्यें फिरत असतांना आपण वाट चुकतो. आपली दिशाभूल होते. आपल्या जवळच्या व प्रेमांतील माणसांची ओळख विसरतो यास भ्रम म्हणतात.   
कां उन्मत्त द्रव्य संचिलें । तेणें अनेक भासों लागलें ।
नाना वेथां कां झडपिलें । भूतें तो भ्रम ॥ १५ ॥
१५) अंमली पदार्थ खाल्यानें अगर प्ययल्यानें ापल्याला नाहींत त्या व्यथा आहेत असें वाटणें, भूतबाधा होणें,
दशावतारीं वाटती नारी । कां ते मांडली बाजीगरी ।
उगाच संदेह अंतरीं । या नांव भ्रम ॥ १६ ॥
१६) दशावताराच्या नाटकांत काम करणार्‍या बायका खर्‍या वाटणें, जादूचे खोळ खरें वाटणें, कांहीं कारण नसतांना मनांत संशयानें घर करणें हें सर्व भ्रमच.  
ठेविला ठाव तो विसरला । कां मार्गी जातां मार्ग चुकला ।
पट्टणामधें भांबावला । या नांव भ्रम ॥ १७ ॥
१७) आपण ज्या जागी वस्तु ठेविली ती जागा विसरणें, रस्त्यानें जात असतां वाट चुकणें, मोठ्या शहरांत बावरुन किंवा गोंधळून जाणें हा भ्रमच होय.  
वस्तु आपणापासीं असतां । गेली म्हणोनि होये दुचिता ।
आपलें आपण विसरतां । या नांव भ्रम ॥ १८ ॥
१८) एखादी वस्तु आपल्या जवळच असून ती हरवली असें वाटणें, त्यामुळें उदासीन होणें, प्रसंगी आपण कोण, कोठे आहोत याचा विसर पडणें हा भ्रमच होय.           
कांहीं पदार्थ विसरोन गेला । कां जे सिकला तें विसरला ।
स्वप्नदुःखें घाबिरा जाला । या नांव भ्रम ॥ १९ ॥
१९) आपल्या वस्तुंपैकी कांहीं व्तु विसरुन सोडून जाणें, शिकलेली विद्या अगर कला विसरणें, स्वप्नामध्यें झालेल्या दुःखद प्रसंगानें घाबरे होणें याला भ्रम म्हणतात.  
दुश्र्चिन्हें अथवा अपशकुन । मिथ्या वार्तेनें भंगे मन ।
वचके पदार्थ देखोन । या नांव भ्रम ॥ २० ॥
२०) अशुभ चिन्हे बघून, अपशकुन झालेला पाहुन किंवा खोट्या बातम्या ऐकून मन अस्वस्थ होणें, कांहीं वस्तु बघुन दचकणें याला भ्रम म्हणतात. 
वृक्ष काष्ठ देखिलें । मनांत वाटे भूत आलें ।
कांहींच नस्तां हडबडिलें । या नांव भ्रम ॥ २१ ॥  
२१) एखादें झाड किंवा मोठें लाकूड बघून तें भूत आहे असें वाटणें, भिण्यासारखें कांहींच नसतां हादरुन जाणें म्हणजे भ्रमच आहे. 
काच म्हणोन उदकांत पडे । कां सभा देखोन दर्पणीं पवाडे ।
द्वार चुकोन भलतीकडे । जाणें या नांव भ्रम ॥ २२ ॥
२२) समोर दिसणारी कांच नसून पाणी आहे हें न समजल्यानें पाण्यांत पडणें, प्रत्यक्ष सभेकडे न पाहातां आरशांतील सभेचे प्रतिबिंब खरें वाटणें, खर्‍या दारांतून न जातां चुकून भलतेंच दार समजून तिकडे जाणें हें सगळें भ्रमच होय.  
येक अस्तां येक वाटे । येक सांगतां येक निवटे ।
येक दिसतां येक उठे । या नांव भ्रम ॥ २३ ॥  
२३) एक असतां भलतेंच वाटणें, एक सांगितलें तर भलतेंच समजणें, एक दिसलें तर तें भलतेंच आहे अशी कल्पना होणें हें सगळें भ्रमच होय.   
आतां जें जें देइजेतें । तें तें पुढें पाविजेतें ।
मेलें माणूस भोजना येतें । या नांव भ्रम ॥ २४ ॥ 
२४) या जन्मी आपण जें जें दान करुं तें तें पुढिल जन्मी परत मिळेल असें वाटणें, मेलेला माणूस भोजनाला येतो असें वाटणें हें सर्व भ्रमच होत.  
ये जन्मींचे पुढिले जन्मीं । कांहीं येक पावेन मी ।
प्रीती गुंतली मनुश्याचे नामीं । या नांव भ्रम ॥ २५ ॥
२५) या जन्मींचे कांहीं तरी पुढच्या जन्मीं  आपल्याला मिळेल अशी भावना होणें, माणसाच्या नांवांतच प्रेम गुंतुन राहणें याला भ्रमच म्हणतात. 
मेलें मनुष्य स्वप्ना आलें । तेणें कांहीं मागितलें ।
मनीं अखंड बैसलें । या नांव भ्रम ॥ २६ ॥
२६) मेलेला माणुस स्वप्नांत आला व त्यांने कांहीं मागितले तर तें सारखें मनांत घोटाळत राहणें, हा भ्रमच होय. 
अवघें मिथ्या म्हणौन बोले । आणि सामर्थ्यावरी मन चाले ।
ज्ञते वैभवें दपटलें । या नांव भ्रम ॥ २७ ॥  
२७) हें सगळें मिथ्या आहे ासें फक्त बोलायचे आणि मनांत मात्र अधिकार व ऐश्र्वर्य यांची लालसा बाळगणें हा भ्रमच होय.  
कर्मठपणें ज्ञान विटे । कां ज्ञातेपणें बळें भ्रष्टे ।
कोणीयेक सीमा फिटे । या नांव भ्रम ॥ २८ ॥ 
२८) कर्मठपणामुळें ज्ञानाची नावड होणें. तसेंच ज्ञानामुळें जबरदस्तीनें आचारभ्रष्ट होणें, कर्मठपणाचा सनातनीपणा व ज्ञातेपणाचा बेछूटपणा असणें, व्यवहाराच्या मर्यादा उगीच टाकणें, हा भ्रमच होय. 
देहाभिमान कर्माभिमान । ज्यात्याभिमान कुळाभिमान ।
ज्ञानाभिमान मोक्षाभिमान । या नांव भ्रम ॥ २९ ॥
२९) देह, कर्म, जात, कुळ, ज्ञान व मोक्ष यांच्याबद्दल धरलेला अभिमान किंवा दृश्यामधिल कशाहीबद्दल अभिमान धरणें हा सर्व भ्रमच होय.   
कैसा न्याय तो न कळे । केला अन्याये तो नाडळे ।
उगाच अभिमानें खवळे । या नांव भ्रम ॥ ३० ॥
३०) न्याय कोणता तें कळत नाहीं, ान्याय केला तर तो लक्षांत येत नाहीं, अशी स्थिति असून निष्कारण अभिमानानें खवळणें हा सारा भ्रमाचाच प्रकार होय.  
मागील कांहीं आठवेना । पुढील विचार सुचेना ।
अखंड आरुढ अनुमाना । या नांव भ्रम ॥ ३१ ॥
३१) मागचें कांहींच आठवत नाहीं, पुढें काय करावें हें सुचत नाहीं, अशा अवस्थेंत आतां मात्र सारख्या कल्पना करीत राहणें, याला भ्रमच म्हणतात. 
प्रचीतिविण औषध घेणें । प्रचित नस्तां पथ्य करणें ।
प्रचीतीवीण ज्ञान सांगणें । या नांव भ्रम ॥ ३२ ॥
३२) अनुभवानें जें सिद्ध झालेलें नाहीं तें औषध घेणें, तसेंच ज्याचा कोणास अनुभव नाहीं तें पथ्य करणें, ज्याचा स्वानुभव नाहीं तें ज्ञान जगास सांगणें म्हणजे भ्रमच होय. 
फळश्रुतीवीण प्रयोग । ज्ञानेंविण नुस्ता योग ।
उगाच शरीरें भोगिजे भोग । या नांव भ्रम ॥ ३३ ॥  
३३) ज्या प्रयोगाचे फळ माहीत नाहीं असा प्रयोग करणें, ज्ञानाची जोड नसतां योगाचा अभ्यास करणें, उगीचच आपल्या शरीरानें सुखाचे भोग भोगणें हा भ्रमच होय.   
ब्रह्मा लिहितो अदृष्टीं । आणि वाचून जाते सटी ।
ऐशा प्रकारीच्या गोष्टी । या नांव भ्रम ॥ ३४ ॥
३४) माणूस जन्माला येण्या पूर्वी त्याच्या कपाळावर ब्रह्मदेव त्याचे भविष्य लिहून ठेवतो व त्याचे सहाव्या दिवसीं सटी तें वाचून जातें असल्या गोष्टींवर विश्र्वास ठेवणें याला भ्रम म्हणतात.  
उदंड भ्रम विस्तारला । अज्ञानजनीं पैसावला ।
अल्प संकेतें बोलिला । कळावयाकारणें ॥ ३५ ॥
३५) या आतामपर्यंत सांगितलेल्या सर्व गोष्टी भ्रमांत मोडतात. अशाप्रकारें भ्रमाचा फार विस्तार झाला आहे. अज्ञानी लोकांत हे भ्रमाचे प्रमाण मोठें आहे. थोड्या उदाहरणानीं तें लक्षांत यावें म्हणून सांगितलें.
भ्रमरुप विश्व स्वभावें । तेथें काये म्हणोन सांगावें ।
निर्गुण ब्रह्मावेगळें अघवें । भ्रमरुप ॥ ३६ ॥
३६)  हें सर्व विषवच भ्रमरुप आहे.  भ्रमाबद्दल कितीही सांगावें तेवढें थोडेच आहे. एका निर्गुण ब्रह्मा शिवाय बाकीचें सर्व भ्रमरुप आहे.   
ज्ञात्यास नाहीं संसार । ऐसें बोलती अपार ।
गत ज्ञात्याचे चमत्कार । या नांव भ्रम ॥ ३७ ॥ 
३७) आत्मज्ञानी पुरुषाला संसाराचा स्पर्श नाहीं असें बरेंच वेळा सांगितलें आहे. तरी पण देह ठेवलेल्या ज्ञानी पुरुषाचे चमत्कार सांगतात हा सुद्धा भ्रमच आहे. 
येथें आशंका उठिली । ज्ञात्याची समाधी पूजिली ।
तेथें कांहीं प्रचित आली । किंवा नाहीं ॥ ३८ ॥
३८) येथें अशी शंका येतें कीं, समजा आपण ज्ञानी पुरुषाच्या समाधीची पूजा केली तर त्यामुळें त्याच्या अस्तित्वाची कांहीं प्रचीति येते किंवा नाहीं ? 
तैसेचि अवतारी संपले। त्यांचेहि सामर्थ्य उदंड चाले ।
तरी ते काये गुंतले । वासना धरुनि ॥ ३९ ॥
३९) त्याचप्रमाणें पूर्वी होऊन गेलेल्या अवतारी पुरुषांचे केवढें मोठे सामर्थ्य अजून अनुभवास येते हें जर खरें तर अंतकाळीं त्यांची कांहींतरी वासना राहीली व त्यामुळें ते येथें गुंतुन आहेत असें समजायचें काय ?   
ऐसी आशंका उद्भवली । समर्थें पाहिजे निरसिली ।
इतुकेन हे समाप्त जाली । कथा भ्रमाची ॥ ४० ॥
४०) श्रोता म्हणतो कीं, अशी माझी शंका आहे. श्री समर्थांनी तिचें निरसन करावें. भ्रमाचे विवेचन येथें संपलें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भ्रमनिरुपण नाम समास सहावा ॥  
Samas Sahava  Bhrama  Nirupan
समास सहावा भ्रमनिरुपण


Custom Search